बदलापूर : राज्यात सर्वत्र बिबट्याच्या वावरामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असतानाच आता बदलापूरजवळील कराव गावात बिबट्या दिसल्याने मोठी खळबळ उडाली आहे. यापूर्वी बदलापूरजवळील आंबेशीव गावात बिबट्याचे दर्शन झाल्यानंतर आता काराव गावातही बिबट्या आल्याने ग्रामस्थांमध्ये दहशत पसरली आहे.
सोमवारी रात्रीच्या सुमारास कराव-बदलापूर रस्त्यालगत बिबट्या दिसून आला. काराव येथील ग्रामस्थ विलास देशमुख हे कारने घरी परतत असताना त्यांना रस्त्याच्या कडेला बिबट्या दिसला. त्यांनी तत्काळ गावकऱ्यांना याची माहिती दिली आणि सर्वांना सतर्क राहण्याचा इशारा दिला. या घटनेनंतर कराव गावात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून नागरिक रात्री घराबाहेर पडण्यास धजावत नसल्याचं चित्र आहे.
काराव गावात बिबट्या आल्याची माहिती वनविभागाला देण्यात आली असून बिबट्याला जेरबंद करण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे. लवकरात लवकर पिंजरे लावावेत, गस्त वाढवावी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी ठोस पावले उचलावीत, अशी मागणी होत आहे.
दरम्यान, गेल्या आठवड्यात बदलापूरजवळील आंबेशीव गावात दोन बिबटे आल्याची घटना समोर आली होती. त्या ठिकाणी वनविभागाने पिंजरे लावून बिबट्यांना पकडण्याचा प्रयत्न केला होता, मात्र त्यात यश आले नव्हते. त्यामुळे आंबेशीव परिसरातीलच एखादा बिबट्या कराव गावात आला असावा, अशी चर्चा ग्रामस्थांमध्ये सुरू आहे.
बदलापूर, काराव आणि आसपासच्या गावांमध्ये बिबट्याच्या सततच्या दर्शनामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून वनविभागाकडून तातडीच्या आणि प्रभावी कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.























