चिखलोली धरण जून महिन्यात ओव्हर फ्लो
दर्शन सोनवणे
अंबरनाथ : शहराच्या पूर्व भागाला पाणीपुरवठा करणारे चिखलोली धरण यंदा जून महिन्यातच ओव्हरफ्लो झाले असून या धरणातून अंबरनाथ पूर्व भागात शिवाजीनगर, वडवली, महालक्ष्मीनगर आदी परिसराला पाणी पुरवठा केला जातो. त्यामुळे ह्या भागातील अंबरनाथकरांची पिण्याचा पाण्याची चिंता मिटणार आहे.
चिखलोली धरणातून ६ दशलक्ष लीटर इतके पाणी पुरवले जाते. शहराच्या पाणीपुरवठ्याचे महत्त्वाचे स्त्रोत असणारे चिखलोली धरण जून महिन्यातच ओव्हरफ्लो झाले असून संततधार कोसळणाऱ्या पावसामुळे धरणाच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. अगदी जून महिन्याच्या शेवटीच धरण ओसंडून वाहू लागल्याने जलसाठ्याच्या दृष्टीने ही अत्यंत दिलासादायक बाब मानली जात आहे. चिखलोली धरण हे अंबरनाथ तालुक्यातील एक महत्त्वाचे धरण आहे,शहराच्या पूर्व भागाला पाणीपुरवठा करणारे प्रमुख धरण असणारे धरण यंदा लवकर भरल्यामुळे आगामी काळात शहरातील पाणीपुरवठा सुरळीत राहण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. धरण परिसरात सध्या निसर्गरम्य वातावरण पाहायला मिळत असून, पावसाळी पर्यटनासाठी काही पर्यटकांची पावले चिखलोली धरणाकडे वळू लागली आहेत. हिरवाईने नटलेले टेकाडे, ओसंडून वाहणारे पाणी आणि धुक्याचा पडलेला साज या सर्व गोष्टी पर्यटकांना आकर्षित करत आहेत.























